शेर सिंह राणा ची अद्भूत *सत्यकथा........श्रीकांत* काळे 


फूलनदेवी नावाची कुप्रसिद्ध डाकू, तिने बहमाई नावाच्या गावांमध्ये 26 लोकांचे हत्याकांड केले, त्याच्यामध्ये महिला आणि लहान मुले यांचापण समावेश होता. पुढे ती मध्य प्रदेश सरकारला शरण गेली आणि नंतर पुढे राजकारणात येऊन  खासदार झाली.

 त्यानंतर  26 जुलै 2001 मध्ये तिला गोळ्या घालण्यात आल्या आणि तिचा त्यामध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी शेर सिंह राणा उर्फ पंकज सिंग नावाच्या  व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.


 4 फेब्रुवारी 2004 रोजी अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या दिल्लीच्या तिहार जेलमधून या शेर सिंह राणा ने अतिशय नाट्यमयरीत्या पलायन केले.


हरिद्वारजवळ रुरकी नावाचं गाव आहे तिथला हा शेर सिंह राणा होता.  आजोबांची  42309 एकर जमीन होती परंतु कायद्यामुळे  वडिलांकडे त्यातली  केवळ 185 एकरच उरली होती.


शेर सिंह राणाने जेलमधून पलायन केले  तेही एखाद्या चित्रपटाची कथा असावी अशा पद्धतीने. ज्या दिवशी त्याला विविध कारणांसाठी कोर्टात हजर व्हायचं होतं तेव्हाच त्यांनी आपल्या दोन साथीदारांना पोलिसांच्या वेशामध्ये बोलवलं, त्यांच्याकडून खोटी कागदपत्रे तयार करवली आणि या तोतया पोलिसांबरोबर तो कोर्टात जायला निघाला. पुढे यूपीमध्ये गेला. मुरादाबाद , कोटद्वार असं करत करत शेवटी रांची ला पोहचला.  

खोटी कागदपत्रे केली आणि संजय गुप्ता हे नाव धारण केले .या खोट्या नावाने तो बांगलादेशमध्ये गेला. त्याने तिथल्या महाविद्यालयामध्ये  प्रवेश घेतला आणि काहीकाळ तो तिथेच राहिला. तिथून तो मुंबईमध्ये आला. तत्पूर्वी त्याने बांगलादेशातूनच  अफगाणिस्तानमध्ये जाता येईल का याची चाचपणी केली परंतु काही कारणाने ते शक्य होत नसल्याने आणि पोलीसांचा ससेमिरा टाळण्यासाठी त्याला  दिल्लीमार्गे जाण्यासाठी मुंबईला यावे लागले. मुंबईमध्ये तो काही दिवस राहिला. तिथे त्याने अफगाणिस्तान च्या कॉन्सुलेटशी संपर्क केला.  अफगाणिस्तानचा व्हिसा मिळवून तो अफगाणिस्तानात गेला.  अफगाणिस्तानमध्ये गेला तेव्हा तिथे पूर्णतः तालिबानचे राज्य होते.  कोणीही जायला धजावणार नाही अशा काळात त्याने हे धैर्य केले! अफगाणिस्तानमधील काबुल हेरात ,कंदहार , गझनी अशा अनेक महत्त्वाच्या शहरांत तो बसने गेला. हॉटेलमध्ये राहिला. तिथे त्याने मित्र मिळवले. विशेष म्हणजे इतक्या कठीण परिस्थितीतही अफगाणिस्तानसारख्या मांसाहारी देशात तो पूर्ण शाकाहारी राहिला. खायला काही मिळाले नाही तेव्हा त्याने ड्रायफ्रूट्स  खाऊन दिवस काढले.  एवढा सगळा उपद्व्याप करण्याचे कारण, शेवटचे हिंदू राजे पृथ्वीराज चव्हाण ह्यांची अफगानिस्तानामधील समाधी त्याला परत आणायची होती. हे त्याने  त्याच्या आयुष्याचे ध्येय ठरवले होते. खरेतर  हे अशक्यप्राय असेच  काम होते! 


पृथ्वीराज चव्हाण कोण ? उत्तरेकडचा शेवटचा मोठा हिंदू राजा. खरेतर अफगाणिस्तानच्या मोहम्मद घोरीने अनेकवेळा पृथ्वीराजवर आक्रमण केले होते आणि प्रत्येक वेळेस पृथ्वीराज चव्हाणने त्याला पराभूत केले होते. पराभूत करूनही त्याला त्याने प्रत्येकवेळी तसेच सोडून दिले होते. याच काळात संयोगिता नावाच्या राजकन्येचे  पृथ्वीराजवर प्रेम जडले होते. पुढे  त्यांनी लग्नही केले. ही गोष्ट संयोगिताच्या वडिलांना म्हणजे कनौजच्या जयचंद राजाला आवडली नव्हती. या गोष्टीचा राग येऊन,  राजा जयचंदने गद्दारी करायची ठरवली आणि तो परकीय  मोहम्मद घोरीला जाऊन मिळाला. दोघांनी मिळून बेसावध असलेल्या पृथ्वीराज चव्हाणला ई.स. 1191 मधे पराभूत केलं. संयोगिता पण पकडली गेली, तिच्यावर बलात्कार झाला आणि ती मरण पावली. पुढे मोहम्मद घोरीने जयचंदलापण ठार केलं. मात्र पृथ्वीराजला घेऊन तो अफगाणिस्तानमध्ये गेला. तिथे त्याने त्याचे दोन्ही डोळे फोडले. अफगाणिस्तान मध्ये गेल्यावर काबूलच्या जवळ तुरुंगात असताना पृथ्वीराजचा एक कवी मित्र त्याला भेटायला आला. त्याने मोहम्मद घोरीला सांगितलं की पृथ्वीराज कडे अशी विद्या आहे की तो आवाजाचा वेध घेऊन बाण मारू शकतो!  मोहम्मदने ही गोष्ट ऐकल्यावर दरबारामध्ये या नेमबाजीचं प्रात्यक्षिक ठेवलं. त्यात एक कुत्रे मारायचे होते. ह्या कवी मित्राने राजस्थानी भाषेत एक शीघ्र काव्य रचले आणि खुबीने या काव्याद्वारे त्याने पृथ्वीराजला मोहम्मद घोरी कुठे बसलाय हे सांगितले! अंध पृथ्वीराज  ने  अचूक बाण मारला आणि त्यामध्ये मोहम्मद घोरी मरण पावला. या गोष्टीमुळे चिडून मोहम्मदच्या सैनिकांनी  पृथ्वीराज आणि त्याच्या कवीमित्राला तिथेच ठार केले आणि मोहम्मद घोरीची मोठी  कबर बांधली. ही कबर अशारीतीने बांधली आहे की तिथे जाताना लोकांना पृथ्वीराजच्या समाधीवर  पाय देऊनच पुढे जावे लागावे! अशी ही पृथ्वीराजांची अपमानित समाधी परत आणून  तिला सन्मानाने भारतात बसवायचे ध्येय शेर सिंह राणाने ठरवले होते.


यासाठीच तो चार महिने तालिबान असलेल्या देशात राहिला. तिथे त्याला प्रत्येक क्षणी मरणाचे भय होते. असे असूनही तो त्या भागात  फिरला. तिथे मित्र जोडले. त्यांत अगदी ड्रगची तस्करी करणारेही दोन मित्र केले एक ब्रिटिश होता आणि एक निग्रो होता. या काळात राणावर खूप संकटे आली. शाकाहारी राहून जगणं अवघड होतं. कारण तिथे शाकाहारी अन्नच मिढत नव्हतं. परिणामी त्याला अनेकदा केवळ ड्रायफ्रूट खाऊन दिवस काढावे लागले. चार महिने अनेक गावे आणि शहरे फिरल्यानंतर, खूप प्रयत्नानंतर त्याला पृथ्वीराजांच्या समाधीच्या जागेचा शोध लागला पण तिथे जायचे कसे हा प्रश्न होता.  तिथला लोकल टॅक्सी वालापण तिथे यायला तयार नव्हता. शेवटी भरपूर रकमेचे आमिष दाखवून एका टॅक्सीने तो त्या गावात पोहोचला. जाताना मात्र त्याने लाहोर चा एक पाकिस्तानी मुस्लीम असल्याचे नाटक करून तसे  नाव धारण केले.  त्या गावात त्यांनी  तालिबानींना सांगितलं की माझ्या आईच्या स्वप्नांमध्ये घोरी ची कबर आली म्हणून मी भेट घ्यायला आलोय. हे ऐकल्यावर गावातल्या लोकांनी त्याला तिथपर्यंत जाऊ दिलं. त्याने ती समाधी व्यवस्थितपणे पाहिली आणि  पंधरा दिवसांनी तो तिथे पुन्हा पोहचला. यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या आईला स्वप्नात घोरी ने सांगितलं की याचा जीर्णोद्धार करायला पाहिजे आणि त्यासाठी मी पैसेही खर्च करायला तयार आहे. यासाठी त्याला काही मजूरांचीही गरज होती. ही सगळी व्यवस्था करत असताना त्याचं बिंग फुटलं.  त्याच्या मागावर पाकिस्तानची आयएसआय संघटना होती.  या लोकानी त्याला मारायचा खूप  प्रयत्न केला पण  तरीही काहीतरी क्लृप्ती वापरून तो त्यांच्या हातातून निसटून काबूलमध्ये लपून राहिला. एक दिवस त्यांनी काबूलमध्ये जे काही थोडेफार हिंदू लोक आहेत त्यातल्या एकाला समाधी काढण्यासाठी तयार केलं परंतु बर्फामुळे आणि अन्य कारणांमुळे ते समाधीपर्यंत   पोहोचू शकले नाहीत. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ब्रिटिश ड्रग तस्कराला बरोबर घेतलं आणि ते संध्याकाळी तिथे जाऊन थांबले. टॅक्सी काही किलोमीटर अंतरावर उभी केली. रात्री दहाला त्यांनी ती समाधी खोदायला सुरुवात केली. माती आणि अन्य काही गोष्टी बरोबर घेतल्या. कबर खोदली आणि तिच्यावर लहानसा तिरंगाही फडकवला! नंतर पृथ्वीराजच्या समाधीची काही माती आणि काही सामान बरोबर घेऊन सकाळी तो काबूलमध्ये पोहोचला आणि  विमानाने दुबईमार्गे तो भारतात संजय गुप्ता म्हणून आला.  दिल्लीमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचे स्मारक बनवायचे स्वप्न असे अंतिम टप्प्यात असतानाच एका खासदारा ने गोड बोलून ते सगळे सामान त्याचाकडून हस्तगत केले आणि त्याला   फसवून ते स्मारक  उत्तर प्रदेश मधील एका गावात बनवले. तिथे शेरसिंह राणांच्या आईच्या हस्ते त्या स्मारकाचं उद्घाटन केले.  शेरसिंह राणा पुन्हा बांगलादेशमध्ये गेला आणि आणलेल्या भेटी मित्रमैत्रिणींना देऊन, त्यांचा निरोप घेऊन तो पुन्हा भारतात आला आणि  स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला! आज तो त्याची सजा तिहारच्या तुरुंगात भोगत आहे. हे सगळे करताना सगळ्यात आश्चर्य म्हणजे त्याने कोणाचीही 

हत्या केली नाही आणि अखेरपर्यंत तो शाकाहारी बनूनच राहिला! 


वास्तविक ध्येयाने पछाडलेली व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते. हत्याही करू शकते पण राणाने तसे काहीही न करता, आपली तत्त्वे सांभाळून अशक्यप्राय काम पण करून दाखवले! 


संदर्भ जेल डायरी, हिंदी

लेखक शेर सिंह राणा

Comments

Popular posts from this blog